शाळा आपा आखा आजे होये... (कथा)
शाळा आपा आखा आजे होये...
लेखनः राजश्री तिखे
भिलोरी संवाद सहाय्यः उषा वसावे
चित्रेः
रोहिणी संजू गायकवाड, जयहिंद हायस्कूल, ९वी, धुळे |
राजलक्ष्मी संदिप गायकवाड, महात्मा गांधी विद्यालय, ६वी, आष्टे, नंदूरबार |
पायल महेंद्र गायकवाड, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, इ. ७वी टोकरतलाव, नंदूरबार
......................................
छोटी धानी वर्गांपुढच्या व्हरांड्यातून धावत निघाली होती. अचानक ती “अयावा, अयावा!” म्हणून जोरात ओरडली. तिच्या पायातून भळभळ रक्त वाहू लागले. रक्त पाहून तर, तिने घाबरून भोकाडच पसरले. ८वीच्या वर्गातून, कोणीतरी तुटलेले अर्धे ब्लेड फेकले होते. त्याने कापून धानीच्या पायाला चीर पडली होती. मुले-मुली धावल्या. कोणीतरी वळवी मॅडमना बोलावले. त्यांनी बँडेज केले आणि खबरदारी म्हणून धनुर्वाताचे इंजेक्शनही देऊन आणले. धानी कितीतरी वेळ रडत राहिली.
७वीत शिकणारा रवी, इतर मुलांप्रमाणे हे सगळं पाहत होता. ही घटना रवीच्या मनाला फारच लागली. धडगाव तालुक्यामधल्या सानवड गावातल्या त्याच्या शाळेत, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तो ‘आरोग्य समिती’चा अध्यक्ष म्हणून निवडला गेला होता. त्याच्याबरोबर ६वीतील सुनिता सचिव आणि त्याच्याच वर्गातला साजन आणि ५ वीतला दिलीप हे सदस्य म्हणून निवडले गेले होते. रवीने आरोग्य समितीमध्ये धानीचा विषय काढला.
सोनावणे सर जवळच बसून ही चर्चा ऐकत होते. ते मुलांना खूपच मदत करायचे, अगदी एखाद्या मोठ्या मित्राने करावी अशी. आरोग्य समितीला ते मार्गदर्शनही करत होते.
“कोणाशी वादावादी, भांडाभांडी, मारामारी नाही करायची. आपल्या वागण्यातूनच आपलं बोलणं समोरच्याला पटलं पाहिजे”, सोनावणे सर म्हणाले.
“मनज्ये कसं कराइचं, सर? आमी परतेक वर्गासमोर कसरापेटी असं लिखून रंगविइने डबे ठिवलेत. त्यामेहे ८वी पोयरं कसरा नाहा टाकते.” साजन पुन्हा तावातावाने म्हणाला
“जे त्यांनी करावं असं तुम्हाला वाटतं ना, ते त्यांना पटेपर्यंत तुम्ही त्यांना करून दाखवायचं.” सर शांतपणे म्हणाले.
रवी टक लावून सरांच्या चेहऱ्याकडे बघत होता. त्याने मनाशी निश्चय केला. त्याच्या मनातला प्लॅन तो आरोग्य समितीबरोबर बोलला. सगळ्यांनी त्याचं म्हणणं मान्य केलं.
दुसऱ्याच दिवशी रवी, सुनिता, साजन आणि दिलीप ८वीच्या वर्गात शिरले. वर्गाच्या दाराबाहेर आरोग्य समितीने ‘कचरापेटी’ असे रंगवून ठेवलेला डबा रिकामा पडला होता. वर्गात चपलांनी आणलेली घाण, पेन्सिलीचे छिलके, पेनाची टोपणे, कागदाचे बोळे, ‘पार्ले-जी’च्या पुड्यांची आवरणं आणि काही गुटख्याचीही पाकिटे अशी घाण सगळीकडे पसरली होती. वरच्या वर्गातली काही मुले गुटखा खायला शिकली आहेत हे रवीच्या कानावर होते. ८वीतले चंदर, मगन, अरविंद आणि इतरही ४-५ मुले टाईमपास गप्पा करत बसले होते.
रवी आणि इतर मुलांकडे काही वेळ पाहत राहिल्यावर चंदर उठला. रवीच्या पुढ्यात उभं राहून त्यानं विचारलं,
७वीच्या वर्गातला लहानखुऱ्या चणीचा रवी, चंदरपुढे एखाद्या उमद्या खोंडापुढे बकरू असावं तसा दिसत होता. पण, त्याच्या चेहऱ्यावर निश्चय होता, कारण तो आरोग्य समितीचा अध्यक्ष म्हणून बोलत होता. “वर्गामेहे सफाई काहा नाहा कअयी?” त्याने विचारले.
पुढे काही न बोलता त्याने कोपऱ्यातला झाडू घेऊन वर्ग झाडायला सुरुवात केली. आरोग्य समितीच्या बाकी मुलांनीही इतर वर्गातून झाडू आणून ८वीचा वर्ग साफ केला. शाळेतली बाकी काही मुले जमा होऊन हा नाट्यप्रसंग पाहत होती. पुढच्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर आरोग्य समितीची फौज झाडू-सुपली घेऊन ८वीच्या वर्गात हजर झाली.
वर्गातली सगळी मुले हसली. अरविंद म्हणजे चंदरचा उजवा हात. रवीने काही न बोलता हात चालवायला सुरुवात केली होती. बाकीच्या वर्गातली मुले येता-जाता किंवा मुद्दामहून येऊन हे पाहत होती. वर्ग १० मिनिटांत लख्ख झाला. त्या दिवशी चंदरबरोबर ऐटीत वर्गाच्या बाहेर पडणाऱ्या अरविंदने पाहिले, की समोरच्या वऱ्हांड्यात उभे राहून सोनावणे सर हे सगळे पाहत आहेत. पुढच्या दिवशी पुन्हा तोच क्रम.
त्यानंतर आरोग्य समितीची मुले वर्गात आली, तेव्हा वर्गात असलेली ८वीची मुले हसली नाहीत. फक्त चंदर मित्रांना मोठ्याने म्हणाला,
तेवढ्यात बघ्यांच्या गटातली ६वीच्या वर्गातली कल्पना पुढे झाली. तिने तिची वर्गमैत्रीण सुनिताच्या हातातला झाडू घेतला आणि झाडायला सुरुवात केली. मग इतरही काही मुले पुढे झाली. आजही समोरच्या व्हरांड्यांत सोनावणे सर उभे होते आणि त्यांच्यासोबत ८वीचे वर्गशिक्षक जाधवर सरदेखील.
जाधवर सर स्वच्छतेविषयी आणि कचरापेटीच्या वापराविषयी ८वीच्या वर्गाबरोबर काहीतरी बोलल्याचे रवीच्या कानावर आले. पुढच्या दिवशी जेव्हा आरोग्य समितीची टोळी ८वीच्या वर्गात पोचली तेव्हा रवीने पाहिले की थोडा कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकलेला होता. त्यानंतर ओळीने चार-पाच दिवस थोडा थोडा कचरा डब्यात पडत राहिला. वर्गातला कचरा कमी झाला.
एका संध्याकाळी रवी आणि आरोग्य समितीची मुले ८वीचा वर्ग झाडून बाहेर पडताना शाळेतल्याच कोणातरी मुलाने आरोळी दिली., “चंदर, चंदर, कसर कसर” (कसर म्हणजे कचरा.) काही मुलं चंदरला चिडवत होती. मग ही आरोळी शाळेत कुठूनही केव्हाही ऐकू येऊ लागली.
एक दिवस मधल्या सुट्टीत खेळताना रवीची विटी अरविंदच्या पुढ्यात पडली. रवी विटी घ्यायला अरविंद समोर उभा राहिला. तेव्हा अरविंदने खाली वाकून विटी उचलून रवीला दिली, पण त्याने नजर उचलून वर पाहिले नाही.
चंदरच्या अवती-भवती असणारी मुलांची गँग कमी झाली होती. अरविंदच्या मनाची पण चलबिचल सुरू झाली होती. एका संध्याकाळी आरोग्य समिती वर्ग झाडून गेल्यावर, अरविंद त्याच्या जिवलग दोस्तासमोर -चंदरसमोर- उभा राहिला आणि
चंदरने खाली मान घातली.
पुढच्या दिवशी आरोग्य समितीची मुले वर्गात शिरली, तेव्हा वर्ग स्वच्छ होता. चंदर, अरविंद, मगन आणि बरीच मुले उभी होती. जणू यांच्या टोळीची वाटच पाहत होती. आरोग्य समिती आश्चर्याने सगळ्यांकडे पाहत राहिली.
आनंदाने फुललेल्या चेहऱ्याने रवी आणि टोळी बाहेर पडली.